
ऐतिहासिक दुर्मिळ वारसा संवर्धनाला प्रोत्साहन -प्राजक्ता लवंगारे-वर्मा
* हेरिटेज कन्झर्वेशन सर्व्हिसेस प्रयोग शाळेला भेट
* पहिला सांस्कृतिक अनमोल वारसा संवर्धन प्रकल्प
नागपूर, दि. 14 :नामशेष होत असलेल्या अनेक ऐतिहासिक सांस्कृतिक वास्तू शिल्पांचे संवर्धन करुन जतन करण्याचा हेरिटेज कन्झर्वेशन सोसायटीच्या प्रकल्पामुळे समृद्ध अशा भारतीय संस्कृतीचा अनमोल ठेवा कायमस्वरुपी बघायला मिळणार आहे. ऐतिहासिक वास्तू संवर्धनाचा हा पहिलाच प्रकल्प असल्याची भावना विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी व्यक्त केली.
सेमिनरी हिल्स येथे हेरिटेज कन्झर्वेशन सोसायटीच्या माध्यमातून वन्य जिवांच्या (ट्रॉफिज) मृगया चिन्हांचे संरक्षण श्रीमती लिना झिल्पे-हाते हा प्रकल्प राबवत आहेत. ऐतिहासिक वास्तू संवर्धन प्रकल्पाला विभागीय आयुक्तांनी भेट देवून पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
वन्य जिवांच्या (ट्रॉफिज)चे संरक्षण वैज्ञानिक पद्धतीने कसे होत आहे. हे यावेळी विभागीय आयुक्तांनी जाणून घेतले. भारतातील प्रथम असलेल्या या प्रयोगशाळेच्या संचालिका लिना झिल्पे-हाते यांनी मृगया चिन्हांच्या ट्रॉफिजसोबतच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कपडे व वस्तूंचे संरक्षण व संवर्धन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दैनंदिन वापरातील वस्तूंचे संरक्षण व संवर्धन केल्यामुळे हा ऐतिहासिक वारसा जतन करणे शक्य झाले आहे. हा ऐतिहासिक वारसा पुढील पिढीतील विद्यार्थ्यांना समजावा या दृष्टिने प्रयत्न करणे गरजेचे असल्याची भावना विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी यावेळी व्यक्त केली.
नागपूरचा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा सुद्धा जतन करताना शास्त्रोक्त पद्धतीने त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे. यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वास्तू सोबतच पुरातन वास्तू शिल्प, वन्य प्राण्यांचे औषध जतन करण्यासाठी लिना झिल्पे-हाते यांनी हेरिटेज संवर्धन सोसायटी सुरु करुन सवंर्धनाचे महत्त्वपूर्ण कार्य सुरु केले आहे. शास्त्रोक्त व तंत्रशुद्ध पद्धतीने केल्या जाणाऱ्या या जतन कार्यातून अनेक वास्तू, शिल्प, वस्तूंना यामुळे नव संजिवनी मिळाली आहे. समृद्ध अशा भारतीय संस्कृतीच्या खाणाखुणा जपण्याचे कार्य नागपूरकर असलेली श्रीमती झिल्पे-हाते करत आहेत.
मध्यवर्ती वास्तू संग्रहालयाचे ऐतिहासिक महत्त्व असलेल्या वास्तूंचे जतन करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. त्यासोबतच वर्धा येथील मगन संग्रहालयातील महात्मा गांधी यांची शाल तसेच इतर वास्तूंचे संवर्धन केल्यामुळे आज नागरिकांना या वस्तू पाहणे शक्य झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेल्या चारशे वस्तूंचे संवर्धन करुन त्या चिचोली येथील संग्रहालयात आज सुस्थितीत ठेवण्यात आल्या आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदरा, कोट, पेटी, टाईप रायटर अशा बऱ्याच वस्तू संवर्धनानंतर मूळ स्थितीत आणून हा ठेवा जिवंत स्थितीत आणला आहे.
वन विभागाच्या सेमिनरी हिल्स येथील प्रयोग शाळेत वाघासह विविध प्राण्यांचे मृगया चिन्हांच्या संरक्षणाचे काम येथे सुरु असून शास्त्रोक्त पद्धतीने सुरु असलेल्या या कामाबद्दल श्रीमती लिना झिल्पे-हाते यांनी सविस्तर माहिती दिली. यावेळी निवृत्त महासंचालक एनआरएलसी डॉ. बी. व्ही. खरबडे उपस्थित होते.