
राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा
प्रतिनिधी/नागपूर
राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करणार असल्याची मोठी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे पत्र परिषदेत केली. नागपुरात कार्यक्रमासाठी आले असता आयोजित पत्र परिषदेत ते बोलत होते.
दिवाकर रावते यांनी विधान परिषदेत राज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन व्हावे हा मुद्दा मांडला होता. राज्यातील मराठी भाषक जनतेची ही मागणी होती. हे विद्यापीठ स्थापन करण्या संदर्भात येत्या आठ ते दहा िदवसात समिती स्थापन करण्यात येईल. या समितीचा अहवाल आल्यानंतर विद्यापीठ स्थापनेच्या हालचालींना अधिक वेग येईल, असे सामंत म्हणाले. मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा मिळावा यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घेणे गरजेचे आहे. यासाठी राज्यात ‘मराठी विद्यापीठ’ स्थापनेला वेग देण्यात येईल असे सामंत म्हणाले.
संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. ती सर्वसामान्यांची भाषा व्हावी, यासाठी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ केवळ रामटेक पुरतेच मर्यादित न राहता त्याची उपकेंद्रे रत्नागिरीसह पुणे, परभणी तसेच जळगाव येथे सुरू करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले. संस्कृत केवळ शिकून उपयोग नाही तर ती बोलता यावी व दैनंदिन व्यवहारात तिचा उपयोग व्हावा, यासाठी ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या नावाने विद्यापीठ स्तरावर ‘संस्कृत भाषा वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित करण्यात येईल, असे सामंत यांनी सांगितले.
महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीने राज्यात मराठी विद्यापीठ स्थापन व्हावे ही मागणी लावून धरली होती. त्यासाठी सर्वपक्षीय राजकारण्यांकडे पाठपुरावा केला. परिणामी अनेक पक्षांनी जाहीरनाम्यात मराठी विद्यापीठ स्थापनेच्या मुद्याचा समावेश केला. आता ही मागणी पूर्ण होत असल्याने त्याचे स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया संयोजक श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी व्यक्त केली.