मनरेगाची अपूर्ण असलेली कामे 30 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करा -जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार
वर्धा दि. 24: कोविड 19 च्या संसर्गाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा परिस्थित लोंकाच्या रोजगारावर परिणाम होणार नाही व कोणतेही काम थांबू नये मात्र गर्दी होऊ नये याची काळजी घेऊन मनरेगाची अपूर्ण असलेली कामे 30 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करावी अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी आज मनरेगाच्या कामाच्या आढावा बैठकित संबधित यंत्रणांना केल्यात.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा 2016-17 पासुनच्या कामाचा आढावा घेतला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी नितीन पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल इंगळे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी विपुल जाधव, वर्धा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. रहाणे, कार्यकारी अभियंता श्री. पडघन, निम्न वर्धा प्रकल्प विभाग, वन विभाग, सामाजिक वनिकरण विभाग आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
रोहयोच्या कामावर 5 टक्के दिव्यांग व्यक्तींची नियुक्तीला प्राधान्य दयावे यासाठी प्रत्येक कामावर किमान एका दिव्यांग व्यक्तीची नियुक्ती करावी. 2021-22 साठी प्रस्तावित करण्यात आलेले विविध कामाचे उद्ष्टिय पूर्ण करण्यासाठी नियमानुसार कामे करावी अशाही सूचना यावेळी श्रीमती देशभ्रतार यांनी केल्या. सेवाग्राम येथील अण्णातलावाच्या सभोवताल असलेल्या झुडपी जंगलात रोहयो योजनेअंतर्गत वृक्षलागवड करावी त्याचबरोबर वर्धा पाटबंधारे विभागांनी फळबाग लागवडीची सुध्दा रोहयो मधून करावी अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
सन 2021-22 साठी जलसंधारण व मृद संधारण , जलव्यवस्थापन, सुक्ष्म व लघुसिंचन कालव्याची कामे व बांधकाम संबंधित कामासाठी यामध्ये नाला सरळीकरण, बंधारा , मातीनाला बांध, स्टॉम डॅम, चेक डॅम्प, समपातळी बांध, वनराई बंधारे, कोल्हापूरी बंधारे, सिमेंट प्लग बंधारे, दगडी बांध कालवा दुरुस्तीची कामे, गाळ काढणे, तलाव नुतणीकरण खोलीकरण, खचलेल्या विहिरी व गुरांचा गोठा, शेळी गोठा व कुकुट पालन अशा 3 हजार 280 कामे विविध विभागाच्या माध्यमातून प्रस्तावित करण्यात आली आहे.