प्रत्येक घरात नळ योजना पोहचवावी – जिल्हाधिकारी अमोल येडगे
यवतमाळ दिनांक 11 मे (प्रतिनिधी)
कुठलीही वस्ती नळ योजनेपासून वंचित राहता कामा नये
पाणी टंचाईबाबत दक्ष राहा
टंचाईग्रस्त भागात प्राधाण्याने पाणी पोहचवावे
आवश्यक ठिकाणी विहिरी अधिग्रहीत करण्यात याव्या
जलजीवन मिशन योजनेचा मुख्य उद्देश प्रत्येक घरात नळ योजना पोहचविणे असल्याने जिल्ह्यातील कोणतेही गाव किंवा एकही वाडी, वस्ती, तांडा, बेडा, कोलाम पोड अशी कुठलीही वस्ती या नळ योजनेपासून वंचित राहता कामा नये. सर्व ठिकाणी पाणी पुरवठ्याची योजना पोहचून प्रत्येक घरात नळ दिला गेला पाहिजे, त्यासाठी नियोजनानुसार शिल्लक काम पुर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज दिले.
जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन तसेच पाणी टंचाई चा आढावा जिल्हाधिकारी यांनी महसूल भवन येथे आज घेतला. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार चौधर, कार्यकारी अभियंता प्रदीप कोल्हे, महाराष्ट्र जीवन प्राधीकरणचे कार्यकारी अभियंता प्रफुल व्यवहारे प्रामुख्याने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की पाणीपुरवठा योजनेमध्ये सर्व गावे सामावून घेण्यासाठी अचूक नियोजन करावे व कामाची गती वाढवून विहित वेळेत काम पुर्ण करण्यात यावे. योजनेत सर्व वस्त्यांचा समावेश करण्यात आल्याचे संबंधीत तालुक्याच्या उपकार्यकारी अभियंत्यांनी प्रमाणित करण्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी पाणी टंचाईचा देखील आढावा घेतला. टंचाईबाबत पुर्णपणे दक्ष राहावे, मागील वर्षी तसेच 2017 मध्ये जास्त टंचाई असतांना ज्या गावात जास्त टँकर लागले होते, त्या गावात प्राधाण्याने पाणी पोहचविण्यासाठी उपाययोजना करावी. टंचाईग्रस्त वस्तीला जवळ पडतील असे पाण्याचे स्रोत टँकरला नेमून द्यावे, आवश्यक ठिकाणी विहिरी अधिग्रहीत करण्यात याव्या. तसेच ज्या ठीकाणी पाऊस चांगला झाला आहे तेथे टँकरची खरच गरज आहे का याबाबत तपासणी करून आवश्यक ठिकाणीच टँकर उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
बैठकीला पाणी पुरवठा विभागाचे सर्व तालुक्यांचे उपकार्यकारी अभियंता अभियंता, जलजीवन मिशन कामात सहभागी संस्थेचे प्रतिनिधी व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.