नागपूर

नागपूरात मंगळवारी ८०४२ घरांचे सर्वेक्षण ; ३७८ ठिकाणी आढळली डेंग्यू अळी

नागपूर, ता. २८ : नागपूर शहरात डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मनपाद्वारे डेंग्यू प्रतिबंधाकरिता सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. डेंग्यू प्रतिबंधाकरिता मनपाच्या आरोग्य विभागाद्वारे संपूर्ण शहरात सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणामध्ये बुधवारी ८०४२ घरांची शहरात तपासणी करण्यात आली. यापैकी ३७८ घरांमध्ये डेंग्यूची अळी आढळली. तसेच मनपाच्या चमूने परिसरातील घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले. कुलरमध्ये, टायरमध्ये व अन्य ठिकाणी पाणी साचले आहे का, याची पाहणी केली. ज्यांच्या घरात पाणी साचले आहे त्यांना याबाबत सूचना देत डेंग्यूचा संभाव्य धोका व त्यासाठी होणाऱ्या दंडाची माहिती दिली. आठवड्यातून एक दिवस ‘कोरडा दिवस’ पाळण्याचे आवाहन करीत जनजागृती केली.

मलेरिया व फायलेरिया विभागातर्फे मंगळवारी (२७ जुलै) रोजी सर्व दहा झोन मिळून ८०४२ घरांची तपासणी करण्यात आली. त्यात ३७८ घरांमध्ये डेंग्यूची अळी मिळाली तसेच ९६ तापाचे रुग्ण आढळले. विभागाच्या कर्मचा-यांनी त्यांच्या रक्ताचे नमूने घेतले.

विभागाच्या कर्मचा-यांनी बुधवारी २७३२ कूलर्स ची तपासणी केली. यामधून ३१८ कूलर्समध्ये डास अळी मिळाली. कर्मचा-यांनी २४७ कूलर्सला रिकामे करुन टेमीफासची गोळी टाकली आणि २४८ ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले.

सतरंजीपुरा झोन अंतर्गत सुरू असलेल्या डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहिमेची प्रशासनाद्वारे बुधवारी (ता.२८) पाहणी करून तेथील स्थितीचा आढावा घेण्यात आला.

यावेळी झोन सभापती मनीषा अतकरे, ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, माजी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, नगरसेविका वैशाली रोहणकर, उपायुक्त विजय देशमुख, झोनल वैद्यकीय अधिकारी, झोनल अधिकारी यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

लकडगंज झोनमधील प्रभाग ३५ अंतर्गत भीम नगर गल्ली नं. ५ येथे डेंग्यूबाधित रुग्ण आढळल्याने मनपाद्वारे परिसरामध्ये आवश्यक उपाययोजना सुरू करण्यात आलेल्या आहेत. परिसरात धूर फवारणी, डासोत्पत्ती स्थानांमध्ये औषधांची फवारणी करण्यात आली. याशिवाय घरोघरी जाउन सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये डेंग्यू सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांना विलग करून त्यांची चाचणी करण्यात आली असल्याची माहिती यावेळी संबंधित आरोग्य अधिका-यांमार्फत देण्यात आली.

परिसरामध्ये डेंग्यूचे रुग्ण वाढू नयेत यासाठी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. मनपाद्वारे आवश्यक सर्व उपाययोजना तातडीने राबविण्यात यावे, असे निर्देश यावेळी उपायुक्त विजय देशमुख यांनी संबंधित अधिका-यांना दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!