Breaking News

लसीकरणाचे प्रमाण कमी असलेल्या गावांवर अधिक लक्ष केंद्रित करावे – जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.

रिसोड तालुक्यातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा

• लसीकरणासाठी गावनिहाय नियोजन करण्याचे निर्देश

• पात्र दिव्यांग व्यक्तीने लसीकरण तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना

वाशिम : कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाट येण्यापूर्वी जास्तीत जास्त व्यक्तींचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामीण भागात लसीकरण मोहीम गतिमान करण्यावर भर द्यावा. विशेषतः ज्या गावांमधील लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, अशा गावांवर अधिक लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिल्या. रिसोड तालुक्यातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी रिसोड तहसील कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, तहसीलदार अजित शेलार, गट विकास अधिकारी संतोष आष्टीकर, पोलीस निरीक्षक जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पोफसे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावांचे संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर सूक्ष्म नियोजन करावे. यामध्ये सदर गावातील ४५ वर्षांवरील किती व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे व अद्याप किती लोकांना लस द्यावयाची आहे, याबाबत माहिती संकलित करावी. ज्या गावांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, अशा गावामध्ये जनजागृती करावी, यासाठी स्थानिक प्रतिष्ठित व्यक्ती, ग्रामस्तरीय समितीची मदत घ्यावी. दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना प्राधान्य द्यावे. ४५ वर्षांवरील दिव्यांग व्यक्तींचे लसीकरण तातडीने पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबवावी. लसीकरण मोहिमेमध्ये सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडावी. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होणार नाही, याची दक्षता घ्यावी. अन्यथा संबंधितांविरुद्ध नाईलाजाने कठोर निर्णय घ्यावा लागेल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगिलते.

जिल्ह्यात सध्या कोरोना विषाणू संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोना चाचण्यांची संख्या कमी होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे. त्याकरिता शहरी व ग्रामीण भागामध्ये घशातील स्त्राव नमुने संकलनासाठी नियोजन करावे. लसीकरण मोहीम आणि स्त्राव नमुने संकलनासाठी स्वतंत्र पथके तयार करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!