राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण
वर्धा, दि 18 🙁 प्रतिनिधि) शहरानजीक असलेल्या नागठाणा चौक येथील राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे उड्डाण पुलाचे केंद्रीय परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
यावेळी खा. रामदास तडस, आ.पंकज भोयर, माजी खासदार सुरेश वाघमारे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे तांत्रिक संल्लागार बी.डी. ठेंग, मुख्य प्रबंधक नरेश वडेटवार, परियोजना संचालक प्रशांत पागृत, प्रकल्प अभियंता साहेबराव जुनघरे, वसंतराव नाल्हे, अशोक बनकर आदी उपस्थित होते.
आज लोकार्पण झालेल्या रेल्वे उड्डानपुलाची लांबी 1.63 किमी. इतकी आहे तर या उड्डानपुलाच्या बांधकामासाठी 66 कोटी 20 लाख इतका खर्च झाला आहे. या उड्डानपुलामुळे 7.40 किमीचा सालोड बायपास रहदारीसाठी पुर्णपणे सज्ज झाला आहे. यामुळे वाहनचालकांचा 15 ते 20 मिनिटाचा वेळ वाचणार आहे.
रेल्वे भूसंपादनाची कार्यवाही गतीने करावी – नितीन गडकरी
जिल्ह्यातील रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचा आढावा
वर्धा जिल्ह्यात चार वेगवेगळ्या रेल्वे मार्गाची कामे सुरु आहेत. या मार्गाच्या भूसंपादनाचे प्रस्ताव रेल्वेने सादर करावेत आणि संबंधित यंत्रणांनी भूसंपादनाची कार्यवाही गतीने करावी, असे निर्देश केंद्रीय परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
गडकरी यांनी विश्राम भवन येथे रेल्वे मार्गांच्या भूसंपादनाचा आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला खासदार रामदास तडस, आ.रामदास आंबटकर, आ.दादाराव केचे, आ.पंकज भोयर, जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता गाखरे, उपाध्यक्षा वैशाली येरावार, जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपजिल्हाधिकारी मनोज खैरनार आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात वर्धा-नांदेड, वर्धा-बल्लारशहा (3 री लाईन), वर्धा-नागपूर (3 री लाईन), वर्धा-नागपूर (4 थी लाईन) या रेल्वे मार्गासाठी भूसंपादन केले जात आहे. भूसंपादनासाठी रेल्वेकडून प्रस्ताव प्राप्त होणे आवश्यक आहे, सदर प्रस्ताव रेल्वे सादर करावे. त्यानंतर महसूल विभाग, वन विभाग आणि रेल्वेने संयुक्तपणे भूसंपादनाची कार्यवाही गतीने करावी, असे गडकरी यांनी सांगितले.
रेल्वेच्या चारही प्रकल्पाच्या भूसंपादनाची माहिती जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिली. रेल्वेकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर त्यावर तातडीने कार्यवाही केली जातील, असे महसूल अधिका-यांनी बैठकीत सांगितले.