नागपूर

विज्ञान संस्थेच्या रासेयो विभागाचे विशेष ‘निसर्गानुभव’ शिबिर

नागपूर दिनांक 1 एप्रिल (प्रतिनिधी)

सिव्हील लाइन्स येथील शासकीय विज्ञान संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष वार्षिक शिबिर पेंच व्याघ्र प्रकल्पातील कोलीतमारा येथे नुकतेच पार पडले. विद्यार्थ्यांना आदिवासी भागातील नागरिकांचे राहणीमान कळावे, त्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांचा अनुभव घेता यावा या उद्देशाने कोलीतमारा या दुर्गम भागात शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

संस्थेच्या संचालक अंजली राहटगावकर, पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक श्रीलक्ष्मी अन्नबथुला, उपक्षेत्र संचालक प्रभुनाथ शुक्ला, सहाय्यक क्षेत्र संचालक किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या शिबीरात पेंच व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल चव्हाण, कोलितमारा आदिवासी आश्रमशाळेचे अधीक्षक अजय चुटे, विज्ञान संस्थेच्या रासेयो विभागाचे प्रमुख श्रीकांत बोरकर आदींची उपस्थिती होती.

तीन दिवस चाललेल्या निसर्गानुभव कार्यक्रमात संस्थेच्या विद्यार्थ्यांनी विविध सर्वेक्षणाच्या माध्यमातून कोलीतमारा येथील आदिवासी नागरिकांच्या दैनंदिन समस्या जाणून घेतल्या. याशिवाय आदिवासी आश्रमशाळेत अध्यापनाचे कार्य केले.

‘कोलीतमारा सारखे अनेक गाव आजही मुख्य प्रवाहातून उपेक्षित आहे. दळवळण, मोबाईल, इंटरनेट यासारख्या साधनांच्या अभावामुळे बेरोजगारी, गरिबी, निरक्षरता यासारख्या समस्यांना तोंड देत आहेत.

येथील शेतकऱ्यांचे जीवन समृद्ध करण्यासाठी कृषीपर्यटनाला चालना दिली जात आहे. या दुर्गम भागातील जैवविविधतेचा प्रचार करून येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी शहरातील नागरिकांनी आणि विद्यार्थ्यांनी प्रयत्न केले पाहिजे’, असे मत विशाल चव्हाण यांनी मांडले. तीन दिवसात केलेल्या विविध सर्वेक्षणाचे माहिती प्रशासनापर्यंत पोहचवून, येथील समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रा.बोरकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!