प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत गावपातळीवर 25 मार्च रोजी शिबीराचे आयोजन
नागपूर दि. 24 मार्च (प्रतिनिधी):
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळविण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना 2019 पासून सुरु केलेली आहे. नागपूर जिल्ह्यात 25 मार्च रोजी लाभार्थ्यांच्या नोंदणीतील त्रुटयांची दुरुस्ती करण्यासाठी गाव पातळीवर शिबीराचे अयोजन करण्यात आले आहे.
ज्या पात्र शेतकऱ्यांना त्रुटीपूर्ततेअभावी योजनेचा लाभ मिळत नाही त्यांनी स्वत:चे बँक पासबुक किंवा चेक बुक, आधार कार्ड, जमीनीचा सातबारा व 8-अ चा उतारा आदी कागदपत्रे गावासाठी नियुक्त अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडे द्यावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत सर्व पात्र शेतकरी कुटुंबीयास दोन हजार रुपये प्रती हप्ता या प्रमाणे तीन हजार असे सहा हजार रुपयांचा लाभ प्रती वर्षी दिला जात आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत योजनेच्या पोर्टलवर एकूण 2 लाख 10 हजार लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. परंतु काही लाभार्थी ट्रान्झाक्शन फेल्युअर, आधार कार्ड दुरुस्ती, पीएफएमएसने नाकारणे आदी कारणांनी लाभापासून वंचित आहेत. या लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी 25 मार्च रोजी होणाऱ्या शिबीरात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.