अनुकंपा भरती व पदोन्नती डिसेंबरच्या आत करा , जिल्हाधिका-यांचे विभाग प्रमुखांना निर्देश
वर्धा दि. 6 डिसेंबर (प्रतिनिधी) :
अनुकंपा तत्वावरील पदे 20 टक्केच्या मर्यादेत भरण्याचे शासनाचे निर्देश आहेत. अनुकंपा पदांसह जिल्हा प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील आपल्या अधिकार क्षेत्रात येत असलेली पदोन्नतीची पदे डिसेंबर महिना अखेर भरण्यात यावीत, असे निर्देश सर्व जिल्हास्तरीय अधिका-यांना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले.
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे, पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत सोळंकी, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा प्रशासन अधिकारी मनोज कुमार शहा यांच्यासह सर्व जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिका-यांनी सर्व विभागांच्या प्रलंबित विषयांचा आढावा घेतला. प्रत्येक कार्यालयात विशाखा समिती असणे आवश्यक आहे. ज्या कार्यालयामध्ये अद्याप समिती गठीत करण्यात आली नसेल त्या कार्यालयांनी गठीत करुन 15 डिसेंबर पर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
दर वर्षी अनुकंपा भरती व पदोन्नती होणे आवश्यक आहे. परंतु अनेक विभाग यासाठी प्रक्रीया राबवित नसल्याचे दिसून येते. या महिन्याअखेर अनुकंपा भरती व पदोन्नती करुन तसा अहवाल सादर करावा. कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल तसेच जेष्ठता यादी विहित मर्यादेत केली जावी अशा सुचनाही जिल्हाधिका-यांनी केल्या.
ज्या कर्मचा-यांचे प्रशिक्षण व्हायचे आहे ते डिसेंबर, जानेवरी या महिन्यात केले जावे. शासनाने ई- ऑफिसला प्राधान्य दिले असून कार्यालयाने ई-ऑफिसचा वापर करावा. कार्यालयीन वापरासाठी फक्त शासकीय ई-मेलचाच वापर करण्यात यावा. कार्यालयातील सर्व कर्मचा-यांचे कोरोना लसीकरणाचे दोन डोज झाले नसतील तर ते पुर्ण करुन घेण्यात यावे, अशा सुचनाही जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्या.