समृद्धी महामार्गमुळे झालेल्या नुकसानीचे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी – जिल्हाधिकारी
वर्धा, दि 28 :- समृद्धी महामार्गाच्या कामामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकाचे व शेतीचे नुकसान झाले आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ आणि रस्त्याचे काम करणाऱ्या संबंधित कंपनीने नुकसान झालेल्या शेतकऱयांना नुकसान भरपाई द्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयात समृद्धी महामार्ग टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी समृद्धी महामार्गाचे व्यवस्थापक निशिकांत सुके, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, हरीश धार्मिक, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता पी आर जनबंधू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, तसेच ऍफकॉन कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर बी के झा आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
समृद्धी महामार्गाच्या बाजूला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नाल्या व्यवस्थित कराव्यात जेणेकरून पावसाचे पाणी बट्यातून वाहून जाईल आणि शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. समृद्धी महामार्गाला जोडणारे गावातील रस्ते दुरुस्त करून द्यावा. तहसील निहाय संपूर्ण रस्त्याची तपासणी करून जिथे काम अर्धवट झालेले आहे ते काम संबंधित कंत्राटदाराने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.
महामार्गाला लागून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पाण्यामुळे आणि धुळीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकर्यांचे पंचनामे करून कोणत्याही शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन नुकसान भरपाई देण्याचे निर्देश त्यांनी दिलेत. नुकसान झालेल्या 89 लोकांनी नुकसानभरपाईसाठी अर्ज केला होता त्यापैकी 66 लोकांना नुकसानभरपाई देण्यात आल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाच्या अभियंत्यांनी दिली.
रस्त्यासाठी खाजगी जागेवरचा मुरूम आणि दगड वापरण्यात आलेला आहे. तेथील काम संपल्यावर त्या खाजगी ठिकाणाचे मोजमाप करून ते स्थळ बंद करून अहवाल सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी त्यांनी दिलेत
महामार्गासाठी गावातील रस्त्यांवरून मोठ्या प्रमाणात साहित्याची वाहतूक करण्यात आली. त्यामुळे गावातील रस्ते आणि पांदण रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झालेले आहेत ते रस्ते संबंधित कंत्राटदार आणि कंपनीने दुरुस्त करून देण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी केल्यात.