लहान मुलांमध्ये करोनाचे प्रमाण वाढू लागले:आरोग्यमंत्री राजेश टोपे
कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात तातडीने बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेची देखील पूर्वसूचना मिळाली आहे. हा धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने पावले उचलली आहेत. विशेष करून लहान मुलांमधील संसर्गाचे प्रमाण लक्षात घेता त्यांच्या उपचारासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स तातडीने निर्माण केला जाईल, असे टोपे यांनी सांगितले.
या माध्यमातून लहान मुलांची काळजी आणि उपचार घेण्यासाठी टास्क फोर्स काम करेल, असे ते म्हणाले. रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविणे, बालकांसाठीचे व्हेंटिलेटर्स, एनआयसीयुमधील बेडस् यांची तयारी करण्यात येत असून या सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील गुरूवारी रात्री दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून विविध बालरोग तज्ञांशी संवाद साधला आहे, असे टोपे म्हणाले.